Type Here to Get Search Results !

दिवाळी - बलिप्रतिपदेचा / पाडवा कथा, पूजा विधी मराठी माहिती दिवाळी चौथा दिवस . :

दिवाळी बलिप्रतिपदेचा /  पाडवा कथा, पूजा विधी मराठी माहिती : 






दिवाळीत येणारी कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दीपावलीचा तिसरा दिवस असतो. हिंदुधर्मीयांचा हा एक मोठा सण आहे. या दिवसाला दिवाळी पाडवा म्हणतात. या दिवशी मध्य आणि उत्तर भारतात नवीन विक्रम संवत् सुरू होते. उज्जैनीचा राजा विक्रमादित्य यानं शकांचं आक्रमण परतवून लावलं, त्यांचा पाडाव केला, त्या विजयाचं प्रतीक म्हणून विक्रमादित्यानं विक्रमसंवत ही कालगणना सुरू केली. इ. स. पूर्व ५७ पासून ही कालगणना प्रचलित आहे. इ. स. पूर्व काळातल्या संस्कृतीच्या वैभवाचं, सर्वागीण सभ्यतेचं आणि एकछत्री राज्यव्यवस्थेचं हे एक उदाहरण आहे.

या दिवशी बळीची पूजा करतात. राक्षस कुळात जन्म घेऊनही बळीच्या पुण्याईने त्याच्यावर वामनदेवाची कृपा झाली. त्याने ईश्‍वरीय कार्य म्हणून जनतेची सेवा केली. तो सात्विक वृत्तीचा व दानी राजा होता. प्रत्येक मानव हा सुरुवातीला अज्ञानी असल्यामुळे त्याच्या हातून वाईट कृत्य घडत असते; परंतु ज्ञान आणि ईश्‍वरीकृपेमुळे तो देवत्वाला पोहचू शकतो, हे यावरून स्पष्ट होते.

हे पण वाचा 🔜 







बलिप्रतिपदा हा दिवस म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी अर्धा मुहूर्त आहे. या दिवसापासून शुभकार्याची सुरवात करण्याची प्रथा आहे. बळीराजाचा हा स्मरणदिन आहे.


बलिप्रतिपदेची आख्यायिका :


बळी हा शेतकऱ्यांचा राजा होता. तो दानशूर, प्रजाप्रेमी व सत्यवचनी होता. त्यामुळे तो देवांपेक्षाही मोठा झाला होता. लोक देवांच्या आधी बळी राजाचे नाव घेतं. त्यामुळे देव संतप्त झाले व त्यांनी विष्णू देवाला साकडे घातले. विष्णू वामनावतार धारण करून बळीकडे याचक म्हणून गेला. तेव्हा “तुला काय हवे ते माग” असे बळी राजाने विचारले. यावर “फक्त त्रिपादभूमी हवी मला” वामन उत्तरला. सर्व काय ते बळी उमजला. परंतू शब्द दिला तो त्याने पाळला आणि “दिली भूमी” म्हणून गरजला. वामनाने एका पावलात स्वर्ग व्यापला तर दुसऱ्या पावलात पृथ्वी व्यापली. तिसरे पाऊल कुठे ठेऊ असे विचारताचं बळीने आपले मस्तक पुढे केले आणि विष्णूने त्याला पाताळात गाडले.
बळीराजाची दानशूरता पाहून वामन खूप आनंदी झाला, वामनाने त्याला पाताळीचे राज्य दिले आणि दात्याची सेवा करण्यास वामनाने बळीराज्याचे द्वारपाल होण्याचे काम स्वीकारले. तो दिवस म्हणजे कार्तिक शुद्ध प्रतिपदा होय. या दिवशी विक्रम संवत सुरू होते.
त्यासोबतच विष्णूने त्याला एक वर दिला. ‘जो कोणी बलिप्रतिपदेला दीपदान करेल त्याला यमयातना भोगाव्या लागणार नाहीत. त्याच्या घरी नेहमी लक्ष्मीचा वास राहील’.
या प्रसंगामुळे लक्ष्मीला आपल्या पतीचे खूप कौतुक वाटले म्हणून तिने पती विष्णूचे औक्षण केले, त्याला ओवाळले. विष्णूने हिरे माणके, अलंकार ओवाळणी म्हणून घातले. यामुळेच आजही बलिप्रतिपदेला पत्नी पतीला ओवाळते आणि पती पत्नीला भेटवस्तू देतो.


बळीचे राज्य येवो... 


पाडव्याला पंचरंगी रांगोळीने बळीची प्रतिमा काढून तिचे पूजन करतात. ‘इडा, पीडा टळो आणि बळीचे राज्य येवो’, अशी प्रार्थना या दिवशी केली जाते. फटाक्यांची आतषबाजी, तसेच दीपोत्सवही केला जातो. या दिवसाचे वैशिष्ट्य म्हणजे साडेतीन मुहूर्तांपैकी एक मुहूर्त म्हणून हा दिवस साजरा केला जातो. 


बळीराजाच्या प्रतिमेचे पूजन का करावे?


या दिवशी बलीराजाच्या प्रतिमेचे पूजन करून त्याला नैवेद्य दाखवला जातो; म्हणजेच त्याच्या क्षुधा-तृष्णा शांत केल्या जातात. त्यानंतर वर्षभर बलीराजाने आपल्या काळ्या शक्तीच्या बळावर पृथ्वीवरील जिवांना त्रास न देता इतर वाईट शक्तींना शांत, म्हणजेच आपल्या ताब्यात ठेवून त्यांना दिलेल्या पाताळाच्या राज्यातच गुण्यागोविंदाने नांदावे, हा त्याच्या प्रतिमेच्या पूजेमागील पूजकाचा भाव असतो.

बलिप्रतिपदेच्या सण साजरा करण्याची परंपरा :


बलिप्रतिपदेच्या दिवशी जमिनीवर पंचरंगी रांगोळीने बली आणि त्याची पत्नी विंध्यावली यांची चित्रे काढून त्यांची पूजा करतात. यानंतर बलीप्रीत्यर्थ दीप अन् वस्त्रे यांचे दान करतात. या दिवशी प्रातःकाळी अभ्यंगस्नान केल्यावर स्त्रिया पतीला ओवाळतात. या दिवशी गोवर्धनपूजा करण्याची प्रथा आहे. त्यासाठी शेणाचा पर्वत करून त्यावर दूर्वा आणि फुले खोचतात. श्रीकृष्ण, इंद्र, गायी अन् वासरे यांची चित्रे शेजारी मांडून त्यांचीही पूजा करतात आणि मिरवणूक काढतात.

व्यापाऱ्यांसाठी नववर्ष :

पाडवा, बलिप्रतिपदा ही व्यापाऱ्यांसाठी आर्थिक हिशेबाच्या दृष्टीने नववर्षाची सुरुवात मानली जाते. लक्ष्मीप्राप्तीसाठी नव्या वह्यांचे पूजन करून व्यापारीलोक वर्षाचा प्रारंभ करतात. जमा-खर्चाच्या नवीन वह्या या दिवशी सुरू केल्या जातात, असे व्यापारी सांगतात. वह्यांना हळद-कुंकू, गंध, फूल, अक्षता वाहून पूजा करतात. या दिवशी मुहूर्ताने व्यवहारसुद्धा केले जातात.

तसेच श्रीकृष्णाने आजच्या दिवशीच गोवर्धन पूजेची सुरवात केली होती. निसर्गाप्रती मानवाच्या कृतज्ञतेची ही सुरुवात होती. त्यानिमित्त पाडव्याला कृष्ण, गोपिका आणि गोवर्धन पर्वताच्या देखाव्याची पुजा केली जाते

Post a Comment

0 Comments
* Please Don't Spam Here. All the Comments are Reviewed by Admin.

Top Post Ad

Below Post Ad